औरंगाबादमधील कुलर तयार करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. औरंगाबादमधील चिकलठाणा एमआयडीसीत आनंद इंडस्ट्रिज या कंपनीत कुलरचे उत्पादन केले जाते. शुक्रवारी एमआयडीसीत शटडाऊन असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते. दुपारी एकच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाचे पाच बंब आणि सहा ते सात पाण्याच्या टँकर्सनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. आनंद इंडस्ट्रिज ही कंपनी कुंदन रेड्डी यांच्या मालकीची आहे. या कंपनीतील आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.