औरंगाबादमधील कचरा समस्येच्या आंदोलनात नागरिकांवर दडपशाही करणारे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना गृहखात्याने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मात्र, यादव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यादव यांच्या वादग्रस्त कारकिर्दीची घेतलेला हा आढावा.. > भाजपाशी जवळीक सत्ताधारी भाजपाशी जवळीक असल्याचा आरोप यशस्वी यादव यांच्यावर केले जातात. औरंगाबाद येथील त्यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मराठवाड्यातील नेते रावसाहेब दानवे यांच्या शिफारस पत्राने झाली होती. त्यामुळे त्यांचे काम भाजपासाठी अनुकूल असल्याचा आरोप केला जायचा. दानवे यांच्या सांगण्यावरून जाणून बुजून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आसल्याचा थेट आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. > अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमाची तिकीटविक्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये झाला होता. त्याच्या आयोजनात पोलीस विभागाने महत्वाची भूमिका निभावली होती. कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीचे काम पोलिसांना दिल्याचा आरोप केला जात होता. या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन यशस्वी यादव यांच्यावर टीका झाली होती. > सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रकल्प शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा यादव यांचा महत्वकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी त्यांनी मोठा निधी देखील आणला होता. शहरात पोलीस स्थानकाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार होते. त्यावेळी पोलीस विभागाकडून शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले होते. त्यावर मुख्यमंत्र्यासोबत पोलीस आयुक्त यांचा फोटो झळकला होता. त्यावरूनही मोठी टीका झाली होती. > प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन औरंगाबाद शहरात आल्या होत्या. त्यावेळी एमआयएमने विरोध केल्यामुळे नसरीन यांना विमानतळावरूनच परतावे लागलं होतं. त्यावेळी आयुक्त गैरहजर असल्यानं आणि नसरीन यांना विमानतळावरून परतावे लागल्यानं पोलीस दलावर टीका झाली होती. > भीमा कोरेगाव येथील दंगलीचे औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. त्या रात्रीच आयुक्त सुट्टीवर गेले होते. पोलीस दलाकडून त्यानंतर राबवलेलं कॉम्बिग ऑपरेशन आणि यादव यांनी गैरहजेरी चर्चेचा विषय होती. > यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी कारणीभूत ठरली ती कचरा प्रश्नावरून पेटलेली मिटमिटा येथील दंगल. मिटमिटा इथं दंगल पेटली तेव्हा यशस्वी यादव सिनेमागृहात चित्रपट पाहत होते, असा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. घटनेनंतर देखील यादव यांनी त्या भागाला तत्काळ भेट दिली नव्हती.