जिल्हा परिषदअंतर्गत असणाऱ्या पाणीपुवठ्याच्या योजना लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटींचा आराखडाही सादर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड.देवयानी डोणगावर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, महिला व बालकल्याण सभापती कुसूम लोहकरे, शिक्षण सभापती मिना शेळके, समाजकल्याण सभापती बेडवाल, हिंदवी खंडागळे, रमेश पवार, पल्लवी नवथर, पार्वतीबाई जाधव आदींसह पाणीपुरवठा, सिंचन, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंते, उपअभियंत्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वनविभागाचे प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.

या बैठकीत २५ नळ योजना विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर ३२ गावात तात्पुरती नळ पाणी योजना सुरू करण्याच्या सूचना यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. डोणगावकर यांनी दिल्या. त्याचबरोबर २४५ गावांतील ५६४ प्रस्ताविक विंधन विहिंरींपैकी अनेक विंधन विहिरींना मंजूरी मिळालेली नाही तरी या विंधन विहिरींच्या सर्वेक्षणाचे आदेश देत पाणीपुरवठ्याच्या विविध योजना मार्गी लावण्याच्या सुचना अध्यक्षा अ‍ॅड.डोणगावकर यांनी दिल्या आहे