औरंगाबाद-जालना विधान परिषद निवडणूक औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेने अंबादास दानवे यांचे नाव निश्चित केल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी बाबुराव कुलकर्णी यांच्या नावाला प्राधान्य दिले. गेल्या वेळी याच मतदारसंघात ऐनवेळी अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांचे नाव कापण्यात आले होते. सुभाष झांबड यांनी उमेदवारी मिळवली आणि ते निवडून आले होते. मात्र, या वेळी कुलकर्णी यांच्या नावाचा पुन्हा विचार करण्यात आला. ६५६ मतदार असणाऱ्या विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसचे १३८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ८० मतदार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजप-सेनेचा या मतदारसंघात सध्या वरचष्मा आहे. १ ऑगस्ट रोजी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने दोन्ही बाजूंनी उमेदवारांची निश्चिती झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. आता दानवे विरुद्ध बाबुराव कुलकर्णी अशी या मतदारसंघात लढत होईल, असे मानले जात आहे.