भावकीतील जमीनवाटप वादातून झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींपकी एकाला नांदेड येथे हलविण्यात आले, तर दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
अंबादास आबाजी भंवर व उद्धव अंबादास भंवर या बापलेकांचा मृत्यू झाला. हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द येथील अंबादास आबाजी भंवर, प्रल्हाद आबाजी भंवर व रामप्रसाद आबाजी भंवर या तिघांमध्ये हिश्श्याच्या जमिनीच्या वाटणीवरून वाद होता. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. लाठय़ाकाठय़ांनी हाणामारीत अंबादास भंवर (वय ६०) व उद्धव भंवर (वय २५) या दोघांचा मृत्यू झाला, तर संजय अंबादास भंवर (वय ३२), प्रल्हाद आबाजी भंवर (वय ६५) व आत्माराम प्रल्हाद भंवर (वय ३०) जखमी झाले. संजयची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारासाठी नांदेडला हलविले, तर इतर दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अयोध्याबाई उद्धव भंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांत प्रल्हाद आबाजी भंवर, आत्माराम प्रल्हाद भंवर, माधव प्रल्हाद भंवर, रामप्रसाद आबाजी भंवर, बालाजी भंवर, सोपान भंवर, विठ्ठल घ्यार, नामदेव घ्यार, सुजानबाई प्रल्हाद भंवर, नंदाबाई आत्माराम भंवर, पार्वती माधव भंवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.