औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील दोन बिहणी एकाच दिवशी विधवा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या दोघा साडूंचा अपघातात मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता हा भीषण अपघात झाला.

औरंगाबादमधील सिडकोमध्ये राहणारे सुनील विनायक काकडे (३४ वर्ष) आणि फुलंब्री तालुक्यातील डोंगरगावचे जगन्नाथ फकिरबा बोडखे (४० वर्ष ) हे दोघे साडू इंडिका कारने (एमएच २० डीएम ९०७६) सिल्लोडमधील डोंगरगावकडे (कवाड) निघाले होते. रात्री साधारण ११.३० वाजता राजूर रोडवरील पाल फाटा येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला जाऊन आदळली. मध्यरात्रीदरम्यान घडलेल्या या अपघातात सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे यांचा जागेवरच मृत्यू झाला. जगन्नाथ यांचे बंधू भीमराव बोडखे या अपघातात गंभीर जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे हे एकमेकांचे साडू होते. त्यांच्या मृत्यूमुळे डोंगरगावच्या (कवाड) दोन बहिणींवर एकाच दिवशी विधवा होण्याची वेळ आली आहे. डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे.