औरंगाबाद : शेअर बाजारात दररोज फार काही आशादायक घडामोडी घडत नसून बाजार नीचांकी पातळीवर कोसळत असतानाही केंद्र सरकारला त्याची चिंता वाटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून ती सावरण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या फळीकडे लक्ष केंद्रित करून देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.

भटके विमुक्त आदिवासी परिषदेस उपस्थित राहण्यापूर्वी ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. एनपीआर, एनआरसी आणि सीएएचा देशभरात विरोध होत आहे. आंदोलनात कोणी सहभाग घेतला त्यांची नावे नागरिकत्व कायद्यातून कायमची वगळण्यात येऊ शकतात. त्यामुळे आंदोलन करणारी फळी कमकुवत होईल. नुकतीच येस बँक केंद्र सरकारने बंद केली असून आगामी काही दिवसांमध्ये देशभरातील मोठय़ा पाच बँका बंद होण्याचा मार्गावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आसाम राज्यात नागरिकत्व कायदा लागू करत असताना १९ लाख २० हजार नागरिकांची बॅच तयार करून त्यांना विशेष कार्ड देण्यात आले आहे. या सर्वाची डिटेन्शन कॅम्पमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यात १९ लाखांपैकी १४ लाख २० हजार नागरिक हिंदू आहेत असे अ‍ॅड. आंबेडकर यावेळी म्हणाले. यावेळी अ‍ॅड. धनराज वंजारी, किसन चव्हाण, नितीन सोनवणे, अमित भुईगळ आदी उपस्थित होते.

करोनाचा बाऊ

सरकार करोनाची भीती उभी करत असून लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण नगण्य आहेत. त्याचा बाऊ केला जात आहे, अशी टीकाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. संकटे येत असतात, प्रशासनाने त्यातून मार्ग काढून महापालिकेच्या निवडणुका ठरलेल्या मुदतीत घेतल्या पाहिजेत. देशात मंदी सुरू असल्याचा गवगवा केला जात असला तरी या देशात मंदी येऊच शकत नाही. कारण ४५ टक्के नागरिक हे दारिद्रय़रेषेखाली जगतात. त्यामुळे त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.