डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मत देशातील आंबेडकरी चळवळीसमोर कधी नव्हे ती गंभीर आव्हाने आज उभी आहेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले सत्यशोधक विचार मंचच्या वतीने येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ४ एप्रिल रोजी १६ वे शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे आंबेडकरवादी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मुणगेकर बोलत होते. व्यासपीठावर मानवाधिकार कार्यकर्त्यां मनीषा तोकले, प्रा. आत्माराम धाबे, सुभाष वारे, अशोक सोनवणे, शीलरत्न वाढवे, प्रा. कैलास राठोड, प्रफुल्ल सावंत, फारुक अहमद, सतीश कावडे, कोंडदेव हाटकर, इंजि. भीमराव हाटकर, श्रावण नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन मान्यवरांनी केले. यावेळी डॉ. मुणगेकर यांनी आंबेडकरांचा काळ आणि त्यांचे विचार व आजची परिस्थिती याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आंबेडकरी चळवळीसमोर आज कधी नव्हे अशी गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांना तोंड देण्याची ताकदही केवळ आणि केवळ याच विचारधारेत आहे, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत समाजातील तळागाळातील उपेक्षित घटकांच्या सर्वागीण उन्नतीचा विचार आणि कृतीतून आपले आयुष्य सत्कारणी लावले. परंतु त्यांच्या या अतुलनीय कार्याची समाजाने मात्र फारशी दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जगभर प्रकाश देणारा सूर्य आणि त्याच्या तोडीस तोड जमिनीवरील सूर्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत, असे गौरवाने नमूद करीत ते म्हणाले की, बाबासाहेबांच्या विद्वतेची सर आजच्याच नव्हे तर आगामी काळातील कोणत्याही भारतीय नेत्याला मुळीच येणार नाही. त्यांनी दलित, बौद्ध, ओबीसी, भटक्या विमुक्त, अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या तरतुदीमुळे तुम्ही आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत.