हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रहालयामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा छायाचित्रासह इतिहास मांडण्याच्या कार्यक्रमात दोन-अडीच वर्षांपूर्वी शिवसैनिक घोषणा देत होते,‘ रामदास कदम तुम आगे बढो’च्या घोषणा देत होते. तेव्हा खासदार खरे यांचे शिवसेतील वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. तो संदेश सेनेमध्ये हवा तसा पोहचला होता. महापालिका निवडणुका होणे बाकी होते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत उमदेवार निवडीपासून ते प्रचारात कोणते मुद्दे कसे ठेवायची याची रणनीती कोणाच्या हातात असेल, हे स्पष्ट झाले होते. रामदास कदम यांच्यामागे सर्व शिवसैनिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले. पण शिवसेनेत कोणाचे काही खरे नसते. रामदासभाईंचे वाढते प्रस्थ मातोश्रीच्या डोळ्यात भरले. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने खैरे यांना अखेर बळ मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार खैरे यांना शह देण्याच्या उद्देशानेच संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आणि पालकमंत्री रामदास कदम जे निर्णय घेतील त्यावर शिक्कामोर्तब होत असे. ही ‘समांतर’ फळी निर्माण करण्यामागे महापालिकेतील समांतर जल योजनेची पाश्र्वभूमी होती. पुढे या योजनेचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेमध्ये झाला आणि आता पुन्हा ही योजना सुरू केल्याशिवाय शहराला दररोज पाणीपुरवठा करता येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. अंबादास दानवे यांनीही खैरे यांच्याशी दोन हात करण्यास सुरुवात केली.

खरेसमर्थक मधल्या काळात म्हणत, ‘आमच्याकडे दोन ‘दास’ आहेत. ते साहेबांना त्रास देतात.’ रामदास आणि अंबादास अशी नावे न घेता सेनेतील गटबाजीची चर्चा पद्धतशीरपणे पोहचवली जात असे. महापालिकेतील प्रत्येक योजनेला कोणत्या गटातील कोणत्या नगरसेवकाला लाभ होतो किंवा होईल, याचीही आखणी केली जात असे. परिणामी खरे आणि कदम यांच्यातील वाद वाढत गेला. अधून-मधून ‘आमच्यामध्ये वाद नाहीत, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत,’ अशी विधाने दोन्ही बाजूने जाहीर केली जायची. पण ती करतानासुद्धा शेजारचा एखादा शिवसैनिक हळूच डोळे मिचकवायचा. स्थानिक नेतृत्वाला एका अर्थाने हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे चित्र होते. पण शिवसैनिकांमध्ये त्याचा फारसा त्रास जाणवायचा नाही. नेत्यांमधील वाद चव्हाटय़ावर आल्यानंतरही मुंबईहून फारसे कोणी लक्ष घालत नव्हते. सामोपचाराने घ्या, असा सल्लाही कोणाला मिळाला नाही. पुढे महापालिकेतील कामांमधून खासदार खरे यांनी लक्ष काढून घेतले. असेही संसदेत शिवसेनेची भूमिका मांडण्याऐवजी महापालिकेतील योजनेमध्येच अधिक असल्याची असल्याची टीका खरे यांच्यावर होत. मध्यंतर मंदिर अतिक्रमणाचा विषय चर्चेत आला. काही धार्मिकस्थळांची अतिक्रमणे काढलीही. मात्र, या काळात मंदिर पाडू द्यायचे नाही म्हणून खासदार चंद्रकांत खरे आक्रमक झाले होते. त्यांनी त्या माध्यमातून पुन्हा समर्थक बांधायला सुरुवात केली. पाणी योजनेतील वादही काहीसा निमला, अशी स्थिती असताना भाजप-सेनेतील महापौरपदाच्या निवडणूक करारानुसार भाजपचे भगवान घडमोडे यांनी राजीनामा दिला आणि खरेसमर्थक नंदकुमार घोडले यांची महापौरपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून खासदार खरे यांचे बळ वाढविल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात कधी या गटाचा कार्यक्रम चांगला व्हायला तर कधी खरे तोंडावर पडायचे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात कन्नड मतदारसंघात उमेदवार उभे केले. स्वत:चा स्वतंत्र गट केला. पण त्यांना पुन्हा पक्षाने बळ दिले. दिवंगत माजी आमदार रायभान जाधव यांच्यावरील पुस्तकाच्या विमोचनासाठी खास उद्धव ठाकरे औरंगाबादला आले. तत्पूर्वी आमदार जाधव यांनी खासदार खरे यांच्याविरोधात त्यांच्या खासदार निधीतून दिलेल्या कामे निष्कृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली होती. खरे जाधव यांच्यामध्ये वाद विकोपाला गेले होते.

जाधव यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उदयसिंह राजपूत यांना खरे यांनी शिवसेनेमध्ये ओढून आणले होते. अशा काळात आमदार जाधव यांच्या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. पुन्हा शिवसेनेत संदेश गेला खासदार खरे यांचे ‘मातोश्री’ वरील वजन कमी झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवारही उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आणि खरे यांच्या बाजूने पक्षप्रमुख आहेत, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून औरंगाबादचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले. या सगळया राजकीय कुरघोडीत अर्जुन खोतकर यांना मात्र त्यांचे पालकमंत्री गमवावे लागले. आता फासे खरेंच्या बाजूने पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

खोतकर यांना फटका

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवारही उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आणि खरे यांच्या बाजूने पक्षप्रमुख आहेत, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून औरंगाबादचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले. या सगळया राजकीय कुरघोडीत अर्जुन खोतकर यांना मात्र त्यांचे पालकमंत्री गमवावे लागले. आता फासे खरेंच्या बाजूने पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने खैरे यांना अखेर बळ मिळाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire become powerful after ramdas kadam removed
First published on: 20-01-2018 at 03:09 IST