मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुताम्यांना करणार अभिवादन मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री.ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ येथे आगमन होणार आहे. सकाळी 8.45 वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.