काँग्रेस पक्षामधील मरगळ घालवण्यासाठी गावागावांत काँग्रेसची एकाच आकारातील पाटी लावली जाणार आहे. शिवसेनेत अशी पाटी लावण्याची पद्धत होती. एवढेच नाही, तर प्रत्येक तालुका कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडिओ कॉन्फरिन्सगची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्हाध्यक्षपदी सत्तार यांची नियुक्ती झाल्यानंतर माजी आमदार कल्याण काळे यांचे कार्यकत्रे नाराज होते. विलासरावांचे समर्थक म्हणून काळे यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष नावाचे पद निर्माण करण्यात येणार आहे. तशी परवानगी प्रदेशाध्यक्षांकडे मागितली असल्याचे सत्तार यांनी सांगितले. जिल्ह्यातील सोळाशे गावांमध्ये काँग्रेसची बांधणी करण्यास विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असते. त्याची पाटी लावली जाते. काँग्रेसकडूनही आता अशा पाटय़ा बनविल्या जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, सर्व जातिधर्माच्या लोकांना सहभागी करून घेण्यावर भर असेल, असे सत्तार यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या वेळी माजी आमदार काळे यांनीही समर्थन दिले होते. त्यांचा आग्रह होता म्हणूनच कन्नडचे पवार यांनाही पद देण्यात आले. काळे यांना जिल्हाध्यक्षपदाच्या समकक्ष पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन व जिल्हाध्यक्ष पदाएवढेच दुसरे पद देण्याचा विचार आहे. कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्याची शिफारस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली जाणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर आणखी काही कार्यकर्त्यांना सामावून घेणे सोयीचे होईल, असेही सत्तार म्हणाले. पक्ष मजबुतीसाठी तरुणांना जोडून घेण्यास विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुस्लिम व मराठा समाजाला जोडून घेत जिल्हास्तरावर झालेल्या या नियुक्त्यांवर बाहेरून आलेल्यांना पदे कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर जिल्हाध्यक्ष सत्तार कशी मात करतात, यावर काँग्रेसची ताकद ठरणार आहे.