जिल्ह्यातील ५६ गावांत ८३ पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. पाण्यात ब्लिचींग पावडरचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. ब्लिचींग पावडरचा वापर करूनही दूषित पाणी नमुन्यात वाढ होत असल्याने ब्लिचींग पावडरच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्लिचींग पावडरचा वापर होतो किंवा नाही? होत असेल तर दूषित पाणी नमुन्यात वाढ कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाअभावी ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहेत. त्यात दूषित पाण्याच्या वापरामुळे साथरोगाची भीती निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून दूषित पाणी नमुने संख्या वाढत असल्याने ब्लिचींग पावडरचा वापर होतो किंवा नाही? होत असेल तर दूषित पाणी नमुन्यात वाढ होण्यामागे नेमके काय कारण दडले आहे? असे प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळेच ब्लिचींग पावडरच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दर्जेदार ब्लिचींग पावडर खरेदी करण्याच्या नावाखाली आरोग्य विभाग व जि. प. पंचायत विभागामध्ये कागदोपत्री नोंदी केल्या जातात. मात्र, मागील अनेक वर्षांपासून दूषित पाणी नमुने आल्यानंतर त्याची माहिती पंचायत विभागाला द्यावयाची व त्यात आपल्या सोयीप्रमाणे सूचना द्यायच्या. नंतर ही माहिती ग्रामपंचायतीला कळवायची हा खेळ अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दूषित पाणी नमुने आढळलेल्या गावांमध्ये गिलोरी, संवड, लोहगाव, कडती, ब्रम्हपुरी, पहेणी, इंजनगाव, किन्होळा, पारर्डी खु., नागेशवाडी, नांदखेडासह ५६ गावांचा समावेश आहे. ५६ गावांमधून ८३ पाणी नमुने दूषित आढळून आले. या बाबतचा अहवाल प्रयोगशाळेने आरोग्य विभागाला सादर केला असून वसमत तालुक्यातील सर्वाधिक ५६ पाणी नमुने दूषित असल्याचे उघडकीस आले. परंतु विशेष बाब म्हणजे कळमनुरी तालुक्यास मात्र दूषित पाणी नमुने रोखण्यात यश आले आहे. या तालुक्यात जानेवारीमध्ये १४पकी एकही पाणी नमुना दूषित आढळून आला नाही. सेनगाव ४, औंढा नागनाथ १४ तर िहगोलीत ९ ठिकाणचे पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले. दूषित पाणी नमुन्याचे नेमके गोडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2016 1:10 am