राज्यातील करोना संकट गंभीर होताना दिसत आहे. विदर्भातून सुरूवात केल्यानंतर करोनानं हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक पाठोपाठ राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोनानं डोकं वर काढलं आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हा आणि महापालिका प्रशासनानं शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अनेक शहरातील परिस्थिती करोनामुळे बिघडत चालली आहे. औरंगाबाद शहरातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, जिल्हा व महापालिका प्रशासन सर्तक झालं आहे. करोना परिस्थितीसंदर्भात औरंगाबादचे जिल्हाधिकारी, शहराचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांची आज बैठक झाली. या बैठकीत शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. १४ मार्चपर्यंत शहरात नाईट कर्फ्यू असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग व कर्मचारी यांना बाहेर पडण्यास मूभा देण्यात आलेली आहे. पुढील बैठकीत आठवडी बाजार आणि भाजीमंडईबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील या शहरात निर्बंध. राज्यातील अनेक शहरात करोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नाईट कर्फ्यू लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात एका आठवड्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अमरावती आणि पुणे शहरातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नाशिक शहरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.