औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान वाळूज येथील सर्व उद्योगही बंद ठेवले जणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस खासदार इम्तियाज जलील यांची मात्र अनुपस्थिती होती. दरम्यान औरंगाबाद शहरात मंगळवारी १५० रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६८८० एवढी झाली असून सध्या ३३७४ रुग्णांवर उपाचार सुरू आहेत.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात 150 करोनाबाधित वाढले, एकूण रुग्णसंख्या 6 हजार 680 वर

लोकप्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये लॉकडाउन कसा असावा, यावर चर्चा झाली असून हा लॉकडाउन अधिक कडक असेल, असे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील जवळपास सर्व भागामध्ये करोना रुग्ण आढळत आहेत. सुरक्षित अंतर फेटाळून लावत औरंगाबाद शहरातील सर्व व्यवहार सुरू होते. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत होते.

आणखी वाचा- बजाज ऑटो तात्पुरती बंद करण्याची युनियनची मागणी; २५० कामगार पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य व्यवस्था वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला. विविध ठिकाणे विलगीकरण कक्ष वाढविण्यात आले. ऑक्सिजनच्या खाटांची सोयही वाढविण्यात आली. पण संसर्ग प्रसार अधिक होत गेला. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ८५० हून अधिक रुग्ण आढळून आल्याने या भागातही लॉकडाउन लावण्यात आला होता. मात्र, कारखाने सुरु असल्याने करोना रुग्ण वाढत गेले. यावेळी लॉकडाउनमध्ये उद्योगही बंद केले जाणार आहेत. ‘जनता संचारबंदी’ असे शब्द वापरुन आठ दिवस कडक टाळेबंदी केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांसह विविध वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी या बैठकीस हजर होते.