औरंगाबादमधील गांधीनगर भागात तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात गणेश चावरीया, संदीप कागडा, नितीन कागडा जखमी झाले आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेश चावरीया यांची प्रकृती चिंताजनक आहे. क्रांतीचौक पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील दोघेजण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी संदीप कागडा गांधीनगर येथील हनुमान मंदिरामध्ये बसला होता. तेव्हा आरोपी दारूच्या नशेत शिवीगाळ करत होता. त्याला मोठ्या आवाजात शिवीगाळ करू नको, असे बजावल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याचा राग मनात धरून आपल्या काही साथीदारांनासोबत घेऊन त्याने संदीपला मारहाण केली. यावेळी संदीप यांचा लहान भाऊ आणि मामा भांडण सोडवण्यासाठी आले. त्यांना देखील या आरोपींना मारहाण केली. यामध्ये संदीपचे  मामा गणेश चावरीया गंभीर जखमी झाले असून त्यांचीप्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिघांवरही घाटी येथे उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी राहुल कागडा, राममेहर कागडा, मनोज कागडा, करण कागडा, अजय कागडा, नरेंद्र कागडा आणि प्रेम कागडा या सात जणांविरोधात क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.