औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील रेल्वेरुळापासून काही अंतरावर एका व्यक्तीचा सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले, की मृत व्यक्तीचे नाव सखाराम उत्तम संतुके असे असून तो हर्सूल भागातील जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीतील रहिवासी आहे. मूळचा तो कन्नड तालुक्यातील दहेगाव येथील असून अनेक वर्षांपासून तो प्लंबर म्हणून काम करीत होता. दरम्यान, घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल असे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सखारामचा मृतदेह अंत्यविधीसाठी दहेगाव येथे नेण्यात आला. सखाराम गेल्या काही दिवसांपासून मुकुंदवाडीतील भावाच्या घरात राहात होता. सखाराम हा नशेत पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे त्याची पत्नी शकुंतला दोन्ही मुलांना घेऊन आठ महिन्यांपूर्वीच घराबाहेर पडली होती. चार ते पाच दिवसांपूर्वी सखाराम जाधववाडीतील भाजी मंडईत गेला होता. तेथे त्याची शकुंतलाशी भेट झाली होती. या वेळी त्याने तिला आपल्यासोबत घरी चल असे सांगितले होते. मात्र, शकुंतलाने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला होता, अशी माहिती समोर येत आहे.