औरंगाबाद : मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. नवकाव्य, नवकथा या क्षेत्रात कुळकर्णी यांनी दिलेले योगदान मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संजीव कुळकर्णी आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत. ‘तृणांची वेदना’, ‘ग्रीष्मरेषा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे कथासंग्रह, ‘कानोसा’ हा काव्यसंग्रह यासह त्यांनी केलेले विविध पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ या मुखपत्राचे ते अनेक वर्षे संपादन करत होते. ‘तु.शं.’ अशी त्यांची आद्याक्षरी ओळख साहित्य वर्तुळात होती. विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. तत्पूर्वी हैद्राबाद संस्थान व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातही त्यांनी नोकरी केली. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, राज्य ग्रंथालय समिती, साहित्य संस्कृती मंडळ यांसह अनेक साहित्यविषयक समितींमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. नवलेखक अनुदान समितीमध्ये तज्ज्ञ परीक्षक, महाराष्ट्र राज्य नाट्य प्रयोगाचे परीक्षक, १९९५ पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ या मासिकाचे संपादक व मसापचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. मराठवाड्यामध्ये नवकथेचे युग तु. शं. कुळकर्णी यांनी आपल्या कथालेखनातून प्रथम आणले. मराठवाडा साहित्य परिषदेने १९५३ मध्ये ‘प्रतिष्ठान’ नामक मुखपत्र सुरू केले. त्यातून तु. शं. कुळकर्णी यांनी गंगाधर गाडगीळांच्या धाटणीचे कथालेखन केले. - सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक मराठवाडा साहित्य परिषदेच्या जुन्या कार्यकत्र्यांपैकी तु. शं. कुलकर्णी हे होते. ‘प्रतिष्ठान’ मासिकाचे संपादक म्हणून आणि मराठवाडा साहित्य सरचिटणीस पदावर त्यांनी दीर्घकाळ काम कले. ते एक चांगले कथाकार होते. - नरेंद्र चपळगावकर, माजी न्यायमूर्ती