लोहारा तालुक्यातील उंडरगाव शिवारात पाण्याच्या शोधामध्ये फिरणाऱ्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तालुक्यातील उंडरगाव शिवारात ही घटना घडली. दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधामध्ये फिरावे लागते. गाव वस्त्या गाठून जेथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन जनावरे तहान भागवतात. वनीकरणामध्ये शासनाने नावालाच पाणवठे बांधले. मात्र, ते कोरडे ठाक पडल्याने ते पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु पाण्याची स्थिती भयावह झााल्याने हरणाचे कळप पाण्याच्या शोधामध्ये फिरत आहेत. उंडरगाव येथील शेतकरी व गावचे उपसरपंच साहेबराव बनाजी सूर्यवंशी यांच्या शेतातील पन्नास फूट विहिरीमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या एका हरणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती वनरक्षक बी. एम. व्हटकर यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.