नगरविकास विभागाने औरंगाबाद शहराचा तयार केलेला विकास आराखडा सोमवारी महापालिकेला सादर केला. मात्र, तत्पूर्वीच त्याला पाय फुटले. काही बडय़ा व्यक्तींना हा आराखडा पूर्वीच मिळाला होता. त्यामुळे सोमवारी सादर करण्यात आलेले नकाशे व बाहेरचे नकाशे सारखेच आहेत काय, याची तपासणी करून कारवाई करू, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले. विलंबाने सादर झालेला हा आराखडा ६ फेब्रुवारीपर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक असल्याने येत्या दहा दिवसांत नगरसेवक त्यावर अभ्यास करतील. त्यानंतर तो स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा करून काही दुरुस्ती करणे आवश्यक असेल तर केल्या जातील, असेही महापौर यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराचा आराखडा तयार करण्यास कमालीचा उशीर झाला असल्याचे सांगत हा आराखडा स्वीकारावा, मात्र झालेला विलंब आणि बाजारात उपलब्ध असणारे नकाशे व सादर करण्यात आलेले नकाशे सारखेच आहेत काय, याची तपासणी करावी अशी मागणी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, राजू वैद्य यांनी केली. विकास आराखडय़ात कोणत्या जागा हरितपट्टय़ात व कोणत्या जागा रहिवाशी या आरक्षणाबाबतचे उल्लेख असतात. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी घेण्यात आली. दरम्यान, हा आराखडा तयार करताना नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप नगरसेवकांना केला. सीलबंद स्वरूपात सादर करण्यात आलेल्या आराखडय़ाबरोबरच सहा नकाशे देण्यात आले आहेत. आराखडय़ासमवेत अस्तिवात असणाऱ्या जागावापराचा अहवाल नगररचना विभागाने देण्याची आवश्यकता होती. तसा तो नसल्याने त्यावर शिवसेना-भाजप नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतले. जागावापराचा अहवाल नसल्याने हा अहवाल स्वीकारून काहीच उपयोग होणार नाही, असे सांगत नगरसेवक राजू िशदे, नंदकुमार घोडले यांनी आक्षेप नोंदविले. हा अहवाल स्वीकारूच नये, अशी विनंतीही काही नगरसेवकांनी केली होती. तथापि तसे केल्यास विलंब लागू शकतो, त्यामुळे शहरात पुन्हा गुंठेवारी वाढेल. परिणामी, विकासकामे करताना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे भाजपचे बापू घडामोडे यांनी सांगितले. ठरवून दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर करण्यास ६ फेब्रुवारी २०१६ ही मुदत असल्याने त्यापूर्वी सहा दिवस हा आराखडा द्यावयाचा असल्याने नगरसेवकांना अभ्यास करण्यास करण्यास कमी वेळ मिळाल्याची तक्रारही नगरसेवकांनी केला. विशेष म्हणजे या सभेस नगररचना विभागातील उपसंचालकांनी हजर राहण्याची आवश्यकता होती. ते आजारी असल्याने सहायक संचालकांनी विकास आराखडय़ाच्या प्रती महापालिका अधिकाऱ्याला दिल्या. विकास आराखडय़ाचा स्वीकार करण्यात आला असला तरी येत्या दहा दिवसांत पुन्हा एकदा बठक घेऊन त्यावर चर्चा केली जाईल, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले.