नेहमी काँग्रेस व राष्ट्रीवादी काँग्रेसच्या बाजूने उभारणाऱ्या मराठवाडय़ात या वेळी भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधून दिसत आहे. लातूरसारख्या काँग्रेसची तब्बल २५ वष्रे सत्ता असणाऱ्या जिल्हय़ात बहुमत मिळवत भाजपचे कमळ फुलले आहे. जालना, औरंगाबाद या जिल्हय़ांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मतदारांनी पसंती दिली. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्न निर्माण केल्याने त्यांनी राजीनाम्याची घोषणाही केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्हय़ातील हा पराभव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही चिंतेत टाकणारा आहे. या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा प्रभाव फक्त नांदेडपुरताच असल्याचे दिसून आले. तर पंकजा मुंडे वगळता रावसाहेब दानवे, बबन लोणीकर यांना त्यांचा प्रभाव टिकवून धरता आला. या दोन्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषदेत खेचून आणलेले यश लक्षणीय आहे. नोटाबंदी, मराठा मोर्चे यामुळे मराठवाडय़ात भाजपला म्हणावे तसे स्थान मिळणार नाही, असा अंदाज लावला जात होता. प्रत्यक्षात भाजपच्या पदरात चांगले यश पडले. तुलनेने शिवसेना विखुरलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसून आले. उस्मानाबादसारख्या जिल्हय़ात खासदार रवींद्र गायकवाड यांना त्यांच्या मुलास निवडून आणता आले नाही. तानाजी सावंत यांच्याकडे नेतृत्व दिल्यापासून सेनेची वाताहत सुरू आहे. औरंगाबादमध्येही या वेळी भाजपाला मिळालेले यश लक्षणीय म्हणता येईल. ग्रामीण भागातील या यशात आमदार प्रशांत बंब यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. खुलताबाद, गंगापूर या दोन तालुक्यात त्यांनी मोठा विजय मिळवून दिला. मराठवाडय़ातील आठही जिल्हा परिषदांपैकी बीड व उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता येईल. डॉ. पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा जिल्हय़ावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. बीड जिल्हय़ातही राष्ट्रवादी रुजते असल्याचा संदेश या निवडणुकीतून मिळाला आहे. नगरपालिकानंतर शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात राष्ट्रवादी पुढे येत आहे. हिंगोली जिल्हय़ात शिवसेनेची एक हाती सत्ता होती. मात्र, त्यांना ती राखता आली नाही. त्याची कारणे शिवसेना नेतृत्वाच्या दृष्टीमध्ये आहेत. महापालिका निवडणुकांपुढे शक्तिस्थाने असणाऱ्या जिल्हय़ातही नेत्यांनी पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी शिवसेना तशी वाढू शकली नाही. तुलनेने भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका न करता जलयुक्त शिवार आणि अन्य विकास योजनांचा प्रचार केला होता. नेतेही गावोगावी फिरत होते. तुलनेने शिवसेनेच्या नेत्यांनी एखादी सभा घेतली की झाला प्रचार अशीच भूमिका बजावली. काँग्रेसला शेवटपर्यंत सूर गवसला नाही. नमनालाच प्रचारात सोनरी मुलाम्याची ताटे जेवणाला वापरली जात असल्याचे दिसून आले. त्यातून काँग्रेस जुन्या सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेतून बाहेर पडलीच नाही, असा संदेश अधोरेखित करणारा होता. झालेही असेच काँग्रेसला फारसे काही हाती लागले नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा सर्वदूर प्रभाव नसल्याचेही चित्र जिल्हा परिषद निवडणुकीमधून दिसून आले. त्यांना केवळ नांदेडमध्ये यश मिळाले. अन्यत्र कोठेही आता काँग्रेसला बहुमत मिळवता येईल, असे चित्र नाही. विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित देशमुख यांना लातूर जिल्हा सांभाळता येणार नाही, असा सांगणारा निकाल असल्याने काँग्रेसचे पानीपत भाजपची मुसांडी, असे चित्र आहे. यात पंकजा मुंडेसारख्या नेत्याचा मात्र दारुण पराभव झाला.