औरंगाबादच्या खुलताबादमधून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर काश्मीरमधील काही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

मागच्या दोन ते तीन दिवसांपासून या डॉक्टरची एटीएसकडून चौकशी सुरु होती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना या डॉक्टरने पैसा पुरवल्याचा संशय आहे. या डॉक्टरचे नाव समजू शकलेले नाही. अन्न आणि पाण्यात विष मिसळून घातपात घडवण्याच्या कटात तो सहभागी असल्याचा संशय आहे.

नुकतीच पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट आखत असल्याची माहिती गुतप्तचर यंत्रणांनी दिली होती.

गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांना जेवणात विष मिसळलं जाऊ शकतं म्हणून अलर्ट राहण्यास सांगिलं आहे. यासोबतच जेवणाचं सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगण्यासही सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी नंबरवरुन करण्यात आलेल्या चॅटच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, काश्मीरमध्ये सक्रीय असणारे एमआय आणि आयएसआय एजंट सुरक्षा दलांच्या रेशन साठ्यात विष मिसळण्याची योजना आखत आहेत.

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राइक करुन हिशोब चुकता केला. त्यानंतर पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय लष्कराला हानी पोहोचवण्यासाठी कट आखला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.