|| बिपीन देशपांडे

जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांपुढे चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न; भरपूर दूध देणाऱ्या म्हशीलाही कवडीमोल भाव

मराठवाडय़ातील दुष्काळामुळे जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांपुढे चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूध देणारी जनावरेही भाकड म्हणून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही जनावरे खरेदीसाठी कसाई लोकांची सध्या जनावरांच्या आठवडी बाजारात चांगलीच गर्दी दिसून येत आहे.

औरंगाबादेतील छावणी भागात दर गुरुवारी जनावरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारात गुजरातपासून ते औरंगाबादलगतच्या जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक आदी जिल्ह्य़ांतून येथे म्हशी विक्रीसाठी आणल्या जातात. तेथील खरेदीदारही येथे येतात. सध्या खरेदीदारांमध्ये कसाई लोकांची संख्या अधिक आहे. येथे कसाईही गुरुवारी दूरवरून आलेले होते. काही कसाई हे औरंगाबादजवळच्या मांस निर्यात करणाऱ्या कंपनीसाठी जनावरे खरेदी करण्यासाठी येतात. जालना जिल्ह्य़ातील जामखेड येथील बबनराव महाजन सांगत होते, ‘छावणीतील बाजारात तीन म्हशी विक्रीसाठी आणल्या होत्या. दुपार सरली तरी ग्राहक अजून मिळाला नाही. म्हशी दूध देणाऱ्या पण भाकड म्हणून कसायाला विक्री करण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. कसाई दूध देणारे की भाकड जनावर हे पाहात नाही. ते पाहतात जनावराचे वजन किती भरते ते. त्यावर त्यांची खरेदी चालते.’ जामखेडपासून येथे तीन म्हशी आणण्यासाठी दोन हजार रुपये वाहतूक भाडे दिल्याचे महाजन सांगतात. म्हशींची विक्री जर  झाली नाही तर त्या वाहतूक भाडय़ाचा भरुदड सोसावा लागतो. शिवाय पुन्हा गावी परत जावे लागत असेल तर परतीचे भाडे वेगळे मोजावे लागते. असा चार ते पाच हजार रुपयांचा फटका बसतो. तो सहन करण्याची ताकद शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत म्हैस विकण्याशिवाय पर्याय नसतो. कसाई मग त्याला वाटेल तो भाव ठरवतो. रक्कम नगद हातात मिळत असल्यामुळे शेतकरीही कसायाला जनावरे विकण्यास राजी होतो. जनावर पाहून १५ ते ३५ हजारांपर्यंतचा दर ठरतो.

औरंगाबादेतील एक दूध व्यावसायिक काकासाहेब शिंदे- पाटील सांगत होते की, छावणीच्या जनावरांच्या बाजारात दर आठवडय़ाला म्हशींच्या खरेदी-विक्रीतून लाखोंचा व्यवहार होत असतो. दुष्काळ तर आहेच. पण दूध व्यावसायिकाला म्हशींची खरेदी-विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांच्याकडे चाऱ्याचा प्रश्न असतो ते जनावरे विक्रीसाठी येथे आणतात. अशा परिस्थितीत कसाई खरेदीसाठी पुढे येतो. कसाई आणि शेतकरी असा थेट व्यवहार होत असतो. हा व्यवहार नगद होत असून हातात तत्काळ पैसा मिळत असल्याने शेतकरीही आणलेले जनावर विकून मोकळा होतो.

भाकड जनावरे कसाई खरेदी करतो. आम्ही केवळ दूध देणाऱ्या म्हशींच्या खरेदी-विक्रीसाठी मध्यस्थ म्हणून काम करतो. पण सध्या दुष्काळामुळे चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांकडून म्हशींची खरेदी थंडावलेली आहे. त्यामुळे आमच्या कामावरही परिणाम झालेला आहे.    – विश्वास मुंडे, मध्यस्थ