आयात शुल्क वाढल्याने तेलाच्या दरात वाढ

साखरेच्या दरात एकाच आठवडय़ात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. केंद्र सरकारने १५ टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे करडी तेल वगळता उर्वरित तेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने सरासरी १५ टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे दोन दिवसांपासून तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या पामतेलावर पूर्वी १५ टक्के आयात शुल्क होते. आता ३० टक्के झाले आहे. रिफाइंड पामतेलावर पूर्वी २५ टक्के तर आता ४० टक्के आयात शुल्क लागू झाले आहे. कच्च्या सूर्यफुलावर साडेबारा टक्के तर आता २५ टक्के, रिफायनरी सूर्यफुलाचे आयात शुल्क २० वरून ३५ टक्क्य़ांवर नेण्यात आले आहे. कच्चे सोयाबीन पूर्वी १७.५ टक्के तर आता ३० टक्के, कच्चे रॅपॅसीड तेल पूर्वी साडेबारा टक्के तर आता २५ टक्के, रिफायनरी रॅपॅसीडवर पूर्वी २० टक्के तर आता २५ टक्के आयात शुल्क आकारले जात आहे. परिणामी या तेलाच्या १५ किलोच्या डब्ब्यामागे ४० ते ५० रुपये दरवाढ झाली आहे. शेंगदाणा व करडी तेल आयात करावे लागत नसल्याने या तेलाच्या दरात फार वाढ झालेली नाही. करडी तेलाच्या दरात किलोमागे १० रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे.

साखर घसरली

साखरेच्या दरात आठवडाभरातच २०० रुपयांनी घसरण झाली. दिवाळीनंतरपासून साखर ३०० रुपयांनी उतरली आहे. दिवाळीत ४ हजार रुपयांपर्यंतचा साखरेचा भाव होता. मागच्या आठवडय़ात ३ हजार ८०० रुपयांनी साखर विक्री आली होती. बुधवारी साखर ३ हजार ७०० रुपये क्विंटल दरापर्यंत आली, असे व्यापारी दायमा यांनी सांगितले.

दोन दिवसांपासून दरवाढ

मागील दोन दिवसांपासून विविध प्रकारच्या तेलाच्या किमतीत दरवाढ झाली आहे. केंद्राने आयात शुल्क वाढवले आहे. त्याचा परिणाम दरवाढीतून दिसत आहे. पामतेल, सोयाबीनचे तेल आयात करावे लागते. त्यामुळे त्याचे दरही वाढलेले आहेत.    – नीरज पाटणी, अध्यक्ष, तेल र्मचट असोसिएशन.