पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेने विरोधक म्हणून असणारी काँग्रेसची जागा भरून काढली असल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. भाजप-सेनेतील आरोप-प्रत्यारोप हे लुटुपुटुची लढाई असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील युतीचे सरकार पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही, या शरद पवार यांच्या भूमिकेचे स्वागत केले. मध्यावधी न होता भाजप वगळून अन्य सर्वानी एकत्र येण्याचा विचार केला तरी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला पाठिंबा दिला जाणार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी चव्हाण आले होते. जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील निवडणुका तसेच अन्य राज्यांतील निवडणुकांनंतर मतदारांचा कल कळणार असल्याने या निवडणुकींचा केंद्र सरकारवर प्रभाव पडेल, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थकारणाला घातक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत काढली जाणारी उणीदुणी आणि तिकीट वाटपामध्ये झालेला गोंधळ यावरून असणारी नाराजी लक्षात घेता पक्ष मध्यावधीसाठी तयार आहे काय, असे विचारले असता ‘या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अंतर्गत कुरबुरी झाल्या. मात्र, तिकीट वाटपानंतर पक्ष कार्यकर्ते कामाला लागल्याचे’ त्यांनी सांगितले.