बिपीन देशपांडे

नोकरीत व्यस्त असलेल्या पालकांचा मुलांशी सुसंवाद हरवत चालला आहे. त्यातून मुलांचे भावविश्व काहीसे एकलकोंडे झालेले असून आततायी विचारापर्यंत पोहोचून दूर कुठेतरी पळून जाण्याचा मार्ग युवापिढी जवळ करत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात घरातून पळून गेलेल्या ६९४ मुलांना पकडण्यात यश आले आहे. त्यातील बहुतांश मुलांची कहाणी सैराटमधील प्रेम प्रकरणासारखी आहे.

पकडलेल्या बऱ्याच मुलांत आणि त्यांच्या पालकांमध्ये विसंवाद दिसून आल्याचे रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले.

रेल्वेत १२ बाळंतपणे : गेल्या सहा वर्षांमध्ये १२ बाळंतपणे रेल्वेतच करण्यात आली आहेत. रेल्वेतून पडण्यासारख्या अपघातातील जखमी १६५० जणांना मागील २० वर्षांत वाचवण्यात यश आले. अन्य १९ जणांचा मृत्यू झाला. तर रेल्वेत विसरलेली पर्स, दागिने, पारपत्र, असा पावणेदोन कोटींचा ऐवज संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आला. अशा प्रसंगात समाजमाध्यमाशी जोडलेले ७०० पोलीस, २०० डॉक्टर व इतर सहकारी कामी येतात, असे संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले.

समाजमाध्यमांवर एक गट तयार करून त्यावर देशभरातील सहकारी जोडले आहेत. कोणत्याही क्षेत्रातील घटनेची माहिती त्यावर पाठवली जाते. या माध्यमातून प्रकरणे सोडवण्यात यश येते आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलीस, रेल्वे सेना, नियंत्रण कक्ष, यामधील समन्वयातून शोध मोहीम राबवण्यात येते.

– अरविंदकुमार शर्मा, पोलीस निरीक्षक, आरसीएफ