नाकेबंदी तर झाली आता तपासणीची प्रतीक्षा औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारकास करोनाची बाधा झाल्यानंतर मीटमिटा भागातील कासलीवाल तारांगण या इमारतीमधील सात कुटुंबांच्या मनात भीती दाटली आहे. या इमारतीचे सोमवारी निर्जंतुकीकरण केले गेले. मात्र, अद्याप येथील प्राथमिक तपासणी करणे बाकी असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात होते. पोलिसांनी आता या इमारतीमधून कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असे सांगितले आहे, पण या आरोग्य परिचारकाचा संपर्क कसा आणि किती वेळ आला हे आठवून पाहिले जात आहे. मीटमिटा भागातील कासलीवाल तारांगण या इमारतीमध्ये घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे निवासस्थान आहे. १२ सदनिकांपैकी सहा सदनिकांमध्ये कुटुंब राहतात. या इमारतीमध्ये राहणारे श्रीकांत देशपांडे म्हणाले,‘ तसे टाळेबंदीनंतर बहुतेकजण घरातच आहेत, पण एकच इमारत असल्याने अधून-मधून भेटी होत असत. आता आम्हा सर्वाची प्राथमिक तपासणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.’ करोनाचे भय वाढतेच आहे. हे केवळ एका इमारतीपुरते नाही तर आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्येही आहे. या आरोग्यसेवकांच्या संपर्कातील असणाऱ्या अधिक जोखीम नसणाऱ्या परिचारिकांना घरीच अलगीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी जेथे राहतात तेथील सर्व इमारतीमध्ये भय दाटले आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय स्वतंत्रपणे करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील विश्रामगृहात या डॉक्टरांची निवासाची सोय करावी, अशी मागणी केली आहे. केवळ आरोग्य कर्मचारीच नव्हे तर महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या बदली वाहनचालकासही करोनाची बाधा असल्याने विलगीकरण केलेल्या व्यक्तीचा आकडा वाढू लागला आहे.