वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटून झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आज (रविवार) मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलीस मंत्र्यांच्या दबावाखाली करत असून, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवू असे सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगाव येथील कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबीयांना तातडीने १० लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना ५ लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही. मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला, ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, बाजार समितीचे सभापती सुर्यभान मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. मधुकर आघाव, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.