पाच सिंचन प्रकल्प जूनअखेर पूर्णत्वास, १४ हजार हेक्टर क्षेत्र लवकरच ओलिताखाली

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या सिंचनातील व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने मराठवाडय़ातील पाच सिंचन प्रकल्प जवळपास पूर्ण केले आहेत. जून अखेपर्यंत म्हणजे महिनाभरात १४ हजार ६८६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यातून ६३.२०६ दक्षलक्ष घनमीटर (२.२३ टीएमसी) पाणी उपलब्ध होणार आहे.

मार्च अखेपर्यंत ८३८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. आकडय़ांच्या भाषेत सिंचनक्षेत्र वाढले असले तरी कालवे पूर्ण न झाल्याने पाणी पोहोचण्याचे प्रमाण केवळ २९ टक्केच आहे. निम्न दुधना, नांदूर-मधमेश्वर, उर्ध्व पैनगंगा ही पंतप्रधान सिंचन योजनेतील कामे पूर्णत्वास आली असली तरी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी वाळूचा पेच कायम आहे. या प्रकल्पास तीन हजार ब्रास वाळू लागणार होती. मात्र, केवळ ६०० ब्रास वाळू ठेकेदाराला उपलब्ध झाल्याने कामे खोळंबली आहेत.

निम्न दुधना सिंचन प्रकल्प जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. या प्रकल्पातून ४४ हजार ४८२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. जून अखेपर्यंत १५३२ हेक्टर सिंचनाखाली आणणे बाकी आहे. अशीच स्थिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून २८०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यातील केवळ १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे बाकी आहे. महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, असा दावा केला जात आहे.

नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचा दुसरा टप्पा आता जवळपास पूर्ण झाला आहे. बळीराजा सिंचन प्रकल्पातील कामेही मार्गी लावण्यात येत असली तरी वाळूचा पेच कायम आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाला लागणारी वाळू उपलब्ध होऊ शकली नाही. परभणी जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील हस्सा या रेती घाटावरून ३ हजार ९२ ब्रास रेतीसाठा उत्खनन करण्यास मान्यता देण्यात आली होती. पण तेवढी वाळू उपलब्ध झाली नाही. परिणामी काम थांबले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याचे अस्तरीकरण रखडले होते. या कामाच्या निविदा २०११-१२ मध्ये निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, बांधकामासाठी आवश्यक साहित्य मिळत नसल्याने हे काम रखडले होते. जून २०१९ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिली आहे.

पाणी पोहोचण्याचे प्रमाण २९ टक्के

मार्च २०१९ पर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी ६९ हजार ४०३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. पाणीसाठय़ाचे उद्दिष्टही काहीअंशी पूर्ण करण्यात आले असले तरी कालवा खंडित असल्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अजूनही पाणी पोहोचत नाही. पाणी पोहोचण्याचे हे प्रमाण केवळ २९ टक्के एवढे आहे.

सिंचनाचे यश पावसावर

मराठवाडय़ातील तीव्र दुष्काळामुळे बहुतांश धरणे कोरडी पडली आहेत. सर्व धरणांमध्ये मिळून १.८० टक्के एवढाच पाणीसाठा आहे. एकीकडे शुष्कता वाढत असतानाच सिंचनाच्या क्षमता वाढविण्यात काहीअंशी सरकारला यश आले असल्याचे दिसून येत असले तरी त्याचा लाभ मात्र पाऊस पडला तरच होऊ शकेल.