औरंगाबाद / जालना : जालन्यातील लोखंडी सळया उत्पादित करणाऱ्या कंपनीत वितळलेले लोखंड अंगावर पडून जखमी झालेल्या दहा कामगारांपैकी चौघांचा औरंगाबादेत रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी आणखी दोघे अत्यवस्थ असून त्यांच्यावर औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चार जणांना जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सरोजकुमार काबी, अवधेशकुमार पाल, हेमंतकुमार पिल्लई व श्यामसुंदर यादव, अशी मृत चौघांची नावे आहेत. मृत व जखमी हे उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती तपासी अधिकारी चंद्रभान गवांदे पाटील यांनी दिली. जालन्यातील सळया उत्पादन करणाऱ्या सप्तशंृगी उद्योगात वितळलेले लोखंड अंगावर पडून दहा कामगार जखमी झाले होते. गंभीर जखमी असलेल्या सहा कामगारांना औरंगाबादेतील बीड वळण रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. यातील चार जणांचा रविवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला.