भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद-नगर रोडवरील गोलवाडी फाटय़ाजवळ शनिवारी पहाटे ही घटना घडली. मृत व जखमी हे जालना जिल्ह्य़ातील सेवली येथील रहिवासी असून ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते.

दत्ता वसंतराव डांगे (वय २७), अमोल नंदकिशोर गव्हाळकर (२२), आकाश प्रकाश मोरे (२७) व आकाश बंडू शिलवंत (२६), अशी मृतांची नावे आहेत. तर किरण संजय गिरी (वय २५) व संतोष भास्कर राऊत (२३) हे दोघे जखमी झाले आहेत. हे सहाही तरूण मोटारीने शिर्डीला जात होते. भरधाव मोटारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. मोटार औरंगाबाद-नगर रोडवरील गोलवाडी फाटय़ाजवळ असलेल्या योग सिमेंट कंपनीसमोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे जमादार ए. एस. वामने, पी. एस. आडसूळ यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोटारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सहाही तरुणांना बाहेर काढून उपचारासाठी घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दत्ता डांगे, अमोल गव्हाळकर, आकाश मोरे, अक्षय शिलवंत यांना मृत घोषित केले. तर संजय गिरी याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संतोष राऊत याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.