सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

मोठय़ा धिटाईने ती सांगत होती, ‘भगतसिंगाची फाशी महात्मा गांधी वाचवू शकले असते.’ दहावीच्या वर्गापर्यंत गांधींविषयींची जुजबी माहिती असणारे विद्यार्थी एकामागे एक राजकीय मते व्यक्त करत होती आणि त्यात भारताची फाळणी, पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी यासह अनेक वादग्रस्त घटनांवर बेधडक बोलत होती. कुठून समजली त्यांना ही माहिती? शिक्षणाचा एक टप्पा संपल्यानंतर अकरावीत शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना गांधींविषयी फारशी माहितीच नव्हती. मात्र, गांधींच्या राजकीय आयुष्यातील चुकांचा पाढा मात्र हे विद्यार्थी आवर्जून वाचत होते. त्यांच्यापर्यंत पोहोचलेला चुकीचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी काही गांधीवादी कार्यकत्रे आजही काम करतात पण ते, सर्वत्र पोहचू शकत नाहीत.‘गांधी को गाली दो’ नावाचा एक कार्यक्रम कलेक्टिव्ह सेवाग्राममधील कार्यकत्रे आजही करत आहेत. त्यातील प्रदीप खेलुरकर म्हणाले, पूर्वी पत्रकातून चुकीच्या पध्दतीने पोहचविले जाणारे महात्मा गांधी आता समाजमाध्यमातून सहजपणे चुकीच्या पध्दतीने मुलांसमोर ठेवले जात आहेत, परिणामी १५० व्या जयंतीनिमित्त गांधी तत्त्वज्ञान पोहचविणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.

औरंगाबादमधील प्रतिथयश महाविद्यालयात इयत्ता ११ वी च्या चार तुकडय़ा पण, चारही तुकडय़ांचा मिळून एक वर्ग शिक्षकांनी भरवलेला. त्यात गांधींविषयीचे प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांनी भन्नाट उत्तरे दिली. अतुल िभगारे म्हणाला, भारत-पाकिस्तानची फाळणी होण्यामागे गांधींचा होकारच कारणीभूत ठरला. वैष्णवी कुलकर्णी सांगत होती, भगतसिंगांना फाशी देण्यापासून इंग्रजांना गांधी रोखू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. वैष्णवी शेजारी बसलेली जीगिशा गुप्ता म्हणाली, असहकार चळवळ ठिक आहे पण, अिहसेच्या ऐवजी िहसेचा मार्ग अवलंबिला असता तर देशाला लवकर स्वातंत्र्य मिळाले असते. अकरावीच्या वर्गात आता फक्त मराठी शिकणारी मुलं राहिली नाहीत. विविध भाषिक माध्यमांची मुले शिकतात. त्यातील मंगेश सातपुते, जीगिशा गुप्ता, शेख जमीर यांनी अभ्यासक्रमात त्यांनी शिकलेल्या गांधींची माहिती त्रोटक स्वरूपात दिली. त्यांचा जन्म पोरबंदरचा होता. पत्नीचे नाव कस्तुरबा होते, त्यांनी दांडी यात्रा काढली होती, या पलीकडे गांधींविषयीची माहितीच शिक्षणाच्या एका टप्प्यापर्यंत मिळत नसल्याचे दिसून आले. देवगिरी महाविद्यालयातील प्रा. संजय गायकवाड म्हणाले, जस-जशी अधिक इयत्ता वाढते, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यार्थी घेतात, तेव्हा त्यांना महात्मा गांधी कळायला लागतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासन सेवेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना गांधी समजूनच घ्यावा लागतो. एरवी शालेय अभ्यासक्रमातून शिकवले जाणारे गांधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतात ते असे चुकीचे.