लातूर जिल्हा मात्र उणे चिन्हात औरंगाबाद : गेल्या दशकभरापासून दरवर्षी भूगर्भातील पाणीपातळीत होणारी घट या वर्षी परतीच्या पावसामुळे भरून निघाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी पाणीपातळीच्या जवळ जाणारी आकडेवारी ८७५ विहिरींच्या निरीक्षणातून उपलब्ध झाली आहे. उस्मानाबाद, बीड या दोन जिल्ह्य़ांमध्ये भूगर्भातील पाणीपातळीत सातत्याने घट दिसून येत होती. काही वेळा ती तीन मीटर ते पाच मीटर अशी असे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात हे प्रमाण आठ मीटपर्यंत खाली जात असे. मात्र, या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यातील भूगर्भाची पातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पातळीपेक्षा केवळ १.२४ टक्क्याने कमी आहे. तर उस्मानाबाद तालुक्यातील पाणीपातळी ०.६३ मीटरने कमी झाली आहे. लातूर (०.१०), रेणापूर (३.१०), निलंगा (१.२६), शिरूरअनंतपाळ (२.४५), उदगीर (१.०२), देवणी (१.१५) या तालुक्यांतही पाणीपातळीत काहीशी घट दिसून आली. अन्य सर्व तालुक्यांमध्ये पाणीपातळीत मोठी वाढ दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात (४.५२), कन्नड (४.३७) तर सर्वाधिक वाढ फुलंब्री तालुक्यात (५.१९ मीटर) वाढली आहे. फुलंब्रीबरोबरच परभणी जिल्ह्य़ातील सोनपेठ तालुक्याची पाणीपातळी पाच मीटरने वाढलेली आहे. २०१८ पासून ते २०२० पर्यंतच्या कालावधीत भूगर्भातील पाणीपातळी दरवेळी कमी होत होती. परिणामी पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात टँकर लावावे लागत होते. या वर्षी अशी स्थिती फारशी असणार नाही. तरीदेखील औरंगाबाद तालुक्यात नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागले आहे. अलीकडेच औरंगाबाद तालुक्यात टँकर सुरू झाल्याचे अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे. मराठवाडा नेहमीच दुष्काळामुळे चर्चेत असतो. या वर्षी मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाणी टिकून आहे. धरणांमध्ये आणि जलयुक्त शिवारच्या विविध कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असल्याचे अधिकारी आवर्जून सांगतात. लातूर आणि उस्मानाबाद वगळता मराठवाडय़ातील अन्य सहा जिल्ह्य़ांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या जानेवारीमधील सरासरी पाणीपातळी गाठणारे आकडे निरीक्षण विहिरीतील मोजमापांवरून दिसून आले आहे. विशेषत: दुष्काळी बीड जिल्ह्य़ात त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेवराई, केज, धारूर या अतितीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या तालुक्यातील पाणीपातळी वाढलेली आहे. जिल्हा निरीक्षण विहिरी पाच वर्षांतील जानेवारीधील २०२०मधील सरासरी झालेली वाढ औरंगाबाद- १४१ १०.४२ ७.०९ ३.३३ जालना- ११० ८.०९ ६.१५ १.९३ परभणी- ८६ ९.६२ ५.९७ ३.६५ हिंगोली- ५५ ७.६५ ४.८८ २.७८ नांदेड- १३४ ७.७७ ६.६१ १.१६ लातूर- १०९ ६.६५ ७.४८ उणे ०.८४ उस्मानाबाद- ११४ ७.४० ६.९५ ०.४५ बीड- १२६ ७.८४ ४.९९ २.८५