भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद उफाळून आला आहे. दानवे यांनी चकवा दाखवत कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कन्नडचे माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आरोप करत टीका केली आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी माझे पंचायत समितीचे सदस्य फोडले आहेत. सभापतीच्या निवडणुका झाल्या. माझ्या स्वतंत्र असलेल्या रायभान जाधव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना मी रूबेना कुरेशी यांना सभापती पदी आणि बनकर यांना उपसभापती पदी निवडण्याचे आदेश सदस्यांना दिले होते. मात्र, त्यातील चार सदस्य भाजपानं पळवून नेली. भाजपानं स्वतःच्या एकाला सभापती केलं आहे. हा प्रकार घृणास्पद आहे. यावरून भाजपाची मस्ती अजूनही जिरलेली दिसत नाही. त्यामुळे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या सगळ्या घटनाक्रमात ज्यांना जालन्याचा चकवा असं म्हटलं जातं, ते भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात मोठा सहभाग घेतला असल्याचं मला स्पष्टपणे जाणवत आहे. कारण त्यांनी सहभाग घेतला नसता, तर ही चार माणसं कधीच गळाला लागली नसती. कुठेतरी घरातूनच द्रोह झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे. या आरोपाच खंडन दानवे केलं, तरी रायभान जाधव कुटुंबाला आणि कन्नड तालुक्यातील जनतेला चकवा दिलेला आहे, असा आरोप मी केला तर काहीही चुकीचं नाही,” असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

आणखी वाचा – रावसाहेब दानवेंचा फोटो पाहून खैरेंचा चढला पारा; पदाधिकाऱ्यांना झापले

कन्नड पंचायत समितीची निवडणूक हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र पॅनल उभ करून लढवली होती. हर्षवर्धन जाधव यांनी रायभान जाधव विकास आघाडी उभी केली होती. मात्र, भाजपानं चार सदस्य पळवल्यानं जाधव यांना जोराचा धक्का बसला आहे. या घटनेमुळे कन्नडमध्ये सासरा-जावयाचा आणखी वाढण्याची शक्यता आहे.