आजच्या काळात माणसाची इमानदारी नाहीशी होत चालली आहे, असा अनेकांचा समज असतो. काही लोकांना या इमानदारीचा अनुभव येतो. औरंगाबाद येथेही असाच अनुभव एका महिलेला आहे. तिची ७० हजार रुपये असलेली बॅग एका प्रामाणिक रिक्षाचालकाने तिला परत केल्याने अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचा अनुभव या महिलेला आला. त्याचे झाले असे की, गजानन महाराज मंदिर चौकातून मध्यवर्ती बस स्थानकात गेल्यावर एका महिलेची बॅग रिक्षात विसरली. पण, त्या इमानदार रिक्षाचालकाने बॅग पुंडलीकनगर पोलिसांच्या मदतीने महिलेला परत केली. बॅगमध्ये ७० हजार रुपये होते. भाऊसाहेब खरात असे त्या इमानदार रिक्षा चालकाचे नाव आहे. बोलठाण येथील लीना आहेर या मध्यवर्ती बस स्थानकात जाण्यासाठी गजानन महाराज मंदिर चौकातून लीना आहेर नावाची महिला खरात यांच्या रिक्षात बसली. रिक्षा मध्यवर्ती बस स्थानकात गेल्यावर लीना आहेर या रिक्षातून उतरल्या पण त्याचवेळी त्यांची बॅग रिक्षात विसरली. बसमध्ये बसण्यापूर्वी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच रिक्षाचा शोध घेतला पण रिक्षा तेथून निघून आली होती. दरम्यान, रिक्षा चालकाच्या हा प्रकार लक्षात आला आणि तो सरळ पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गेला. तोपर्यंत लीना आहेर या बॅग गहाळ झाल्याची तक्रार करण्यासाठी ठाण्यात आल्या होत्या. तेथे त्यांना तक्रार देण्यापूर्वीच बॅग मिळाली. पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे, उपनिरीक्षक विनायक कापसे, ठाणे अंमलदार त्र्यंबक पाल्हाळ यांनी ही बॅग लीना आहेर यांना परत केली. तसेच रिक्षा चालक भाऊसाहेब खरात यांचा सत्कार केला.