औरंगाबादमध्ये एका विवाहितेला नवऱ्याने जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने मृत्यूपर्वी पती आपला छळ करत असल्याचा जबाब नोंदवल्यामुळे तिच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पाडेगाव भागात राहणारे हिना आणि रफिक यांनी अडीच महिन्यांपूर्वीच विवाह केला होता. मात्र, सुरूवातीपासूनच त्यांच्यात कुरबुरी आणि भांडणे होत असत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हिना यांना पती शेख रफिक शेख गफूर यांनी जळालेल्या अवस्थेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, हिना यांनी मृत्यूपूर्व जबाबात पती रफिक हा त्रास देत होता, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी हिना यांच्या पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक अतुल कुमार ठोकळ यांनी दिली.