आठवडाभरापासून तूर व हरभऱ्याच्या किमतीत अचानक दररोज वाढ होत असून, डाळीचे भाव या वर्षीही गगनाला भिडणार असल्याची चिन्हे बाजारपेठेत दिसत आहेत. ही भाववाढ सट्टेबाजांनी कृत्रिमरीत्या केल्याची चर्चा बाजारात नव्याने होत आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वी तुरीचे भाव प्रतिक्विंटल ८ हजार ४०० रुपये, तर हरभऱ्याचे भाव ४ हजार २०० रुपये होते. सोमवारी लातूर बाजारपेठेत तुरीचा भाव प्रतिक्विंटल ९ हजार ९०० रुपये, तर हरभऱ्याचा भाव ५ हजार ७०० रुपये पोहोचला. तुरीची सर्वसाधारण आवक ४ हजार क्विंटल, तर हरभऱ्याची आवक ५ हजार क्विंटल होत आहे. उडदाचा भाव क्विंटलला ९ हजार रुपये होता, तो आता १३ हजार ५०० रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती डाळ व्यापारी नितीन कलंत्री यांनी दिली. दहा दिवसांपूर्वी तूर डाळीचे सर्वसाधारण भाव ठोक विक्रीसाठी १२० रुपये किलो होते, ते सोमवारी १४३ रुपये किलो झाले. हरभरा डाळ ५५ रुपये किलोवरून ७४ रुपये किलोवर पोहोचली. किरकोळ बाजारपेठेत तूर डाळीचे भाव १६० रुपये, तर हरभऱ्याचे भाव ८२ रुपये किलोवर पोहोचले आहेत. या वर्षी तूर, हरभऱ्याच्या उत्पादनात दुष्काळामुळे मोठी घट झाली आहे. विदेशातून आयात करून घट भरून काढली जाईल व बाजारावरील नियंत्रण ठेवले जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. पाडव्यापूर्वी भाव स्थिर होते. मात्र, अचानक भाव वाढण्यास सुरुवात झाली. बाजारातील तुटवडा लक्षात घेऊन काही मोठय़ा आयातदारांनी विदेशातच माल खरेदी करून ठेवला असण्याची शक्यता असून येथील भाववाढीनुसार तो माल मागवला जात असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बाजारात अचानक तूर व हरभरा डाळींच्या भावात १५ टक्क्य़ांपेक्षा अधिक भाववाढ होत असेल, तर यात नक्कीच काही काळेबेरे असले पाहिजे, अशी शंका घ्यायलाच हवी. लोकांकडून ओरड झाल्यानंतर पुन्हा हस्तक्षेप करण्यात काहीच हशील होणार नाही. दोन वर्षांपूर्वी वर्षभरात एखाद्या वाणाच्या किमतीत १ हजार ते १ हजार ५०० रुपये क्विंटलमध्ये फरक होत असे. आता हा फरक केवळ १० दिवसात होत असल्यामुळे याला कृत्रिम टंचाईचा वास आहे. राज्य सरकारने साठेबाजांवर कडक कारवाईचे पाऊल उचलल्यामुळे बाजारपेठेत छोटय़ा व्यापाऱ्यांकडे फारसा माल नाही. मोठे सट्टेबाजच यात हात धुवून घेत आहेत व सरकार या कृत्रिम भाववाढीकडे अजून पुरेशा गांभीर्याने लक्ष देत नाही. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा २०० रुपये व हरभरा डाळीचे भाव १०० रुपये किलोवर पोहोचण्याची रास्त भीती व्यक्त केली जात आहे.