वेलदोडे हजार ते बाराशे रुपयांनी वधारले मसाला पदार्थातील जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीत साधारण ३० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. वेलदोडय़ाचे (वेलची) भाव तर किलोमागे तब्बल एक हजार ते बाराशे रुपयांनी वधारले आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात केरळमध्ये झालेला महाप्रलय आणि त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान, यामुळे आवक घटली असून त्याचा परिणाम किमतीत झालेल्या वाढीतून दिसत आहे, असे व्यापारी सांगत आहेत. पानविडय़ात किंवा खीर, बासुंदीत टाकल्या जाणाऱ्या हिरव्या वेलचीचे उत्पादन हे केरळ आणि तामिळनाडूत होते. तर मसाल्यातील वेलचीची शेती ही आसाममध्ये केली जाते. हिरव्या वेलचीमध्ये ७, ७.५ आणि ८ एमएम असे आकार ठरलेले असतात. तर पानबहाग प्रकारची वेलची ही आकाराने बारीक असते. ७, ७.५, ८ एमएममधील वेलचीचे दर किलोमागे एक हजार ते बाराशे रुपयांनी वधारले आहेत. या तिन्ही प्रकारच्या वेलचीचे दर सध्या २८०० ते ३२०० रुपये किलोपर्यंत, तर पानबहाग वेलचीचे दर २४०० ते २६०० रुपये किलोच्या घरात आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत यांच्या दरात एक हजारांपर्यंत वाढ झाली आहे. मसाल्यातील मोठय़ा वेलचीचे दर ६०० ते ७०० रुपये किलोपर्यंत असल्याचे येथील मोंढय़ातील व्यापारी योगेश बांठिया यांनी सांगितले. केरळमध्ये मागील वर्षी पावसाने थमान घातले. परिणामी यंदाच्या वर्षी मसाल्यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. याचा सर्वाधिक फटका हा वेलचीच्या उत्पादनावर झाला. उत्पादन घटल्याने दरांमध्ये वाढ झाली. दर वाढल्यामुळे विक्रीतही ३० टक्के घट झाली. वेलचीसोबतच लवंग, मसाला वेलची, नागकेशर, कपुरचिनीचे दर २० ते ३० टक्क्यांनी वधारले, तर काळी मिरी, लवंग, तेजपान, रामपत्री, जावत्री, दगडफूल, त्रिफळा, हळदीचे दर मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याचे बांठिया यांनी सांगितले.