जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गोदावरीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकांकडे लक्ष

जायकवाडी जलाशयामध्ये ८.९९ अब्ज घनफूट पाणी सोडण्यास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतरही नगर जिल्हय़ात पाणी रोखण्यात आले. या विरोधात शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी सोमवारी होणार आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती शारदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली.

जायकवाडीत पाणी सोडण्याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतरही काही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले. जायकवाडीमध्ये आतापर्यंत केवळ ३.८६ अब्ज घनफूट पाणीच पोहोचले आहे. त्यामुळे मराठवाडय़ावर अन्याय  होत असल्याची भावना सर्वत्र आहे. तर दुष्काळ आणि पाणीटंचाई लक्षात घेता बंधाऱ्यातील पाणी सोडू नये, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

एका बाजूला कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच जायकवाडीमध्ये संथगतीने पाणी येत आहे. मात्र या वेगाने जायकवाडीची तूट भरून निघणार नाही, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, जायकवाडीच्या उपलब्ध पाणी साठय़ातून पठणच्या डाव्या कालव्यातून परळी औष्णिक वीज केंद्रास लागणारा पाणीपुरवठा केला जात आहे.

येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला तरी माजलगाव धरणातही जायकवाडीमधून पाणी सोडणे आवश्यक असणार आहे. त्याचे नियोजन सुरू असले तरी हे पाणी सोडले तरी ते पोहोचविण्यासाठी धरण क्षेत्रत चर खोदावा लागणार आहे. हे चर खोदण्याचे काम सुरू असून त्यामुळे वरून सोडलेले जायकवाडीचे पाणी पोहोचेल, असा दावा अधिकारी करीत आहेत. पाणी सोडण्यासाठी केलेला विलंब आणि पाण्यासाठी सुरू असणारे नगर-नाशिक जिल्हय़ात सुरू असणारे राजकारण यामुळे न्यायालयीन वाद वाढले आहेत. जलसंपदामंत्री व कार्यकारी संचालकांच्या वतीने मराठवाडय़ाची लेखी बाजू मांडली जाईल, पण त्याची अंमलबजावणी करताना घेाळ घातले जातील, असे नवे सूत्र विकसित केले जात आहे. त्यास अटकाव केला जावा यासाठी न्यायालयीन लढा असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • जायकवाडीत सोडायचे पाणी- ८.९९ अब्ज घनफूट
  • आतापर्यंत सोडलेले पाणी- ७.९० अब्ज घनफूट
  • जायकवाडीत आलेले पाणी- ३.८६ अब्ज घनफूट