तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे देवीदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप पुलावरून खाली पडून तीन जण ठार तर १९ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील आंतरवलीनजीक घडली. जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हरूबाई श्रीरंग खेडके या महिलेसह साहेबराव अश्रू िशदे व विठोबा यशवंत मदने अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील कामठी, राळेगण, मांडवगण या तीन गावातील २२ भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शनिवारी सायंकाळी निघाले होते. भाडय़ाने केलेली पीकअप जीप (क्र. एमएच १६, एझेड ४११८) रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील आंतरवलीनजीक आल्यानंतर चालकाला झोप येत होती. खर्डा गावानजीकच्या पुलावर जीप आल्यानंतर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जवळपास १५ ते २० फूट उंचीच्या पुलावरून ही खाली आदळली. जीपमधील काही भाविक झोपलेले होते. १९ भाविक जखमी झाले. अपघातानंतर खर्डा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अंभी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले.