साताऱ्यातील प्रसिद्ध अशा कास पठाराच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्य़ामधील टेकडय़ांवर स्थानिकसह पश्चिम घाट-उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील पुष्पबीजांचे रोपण करून झकास पठार तयार करता येईल का, याची चाचपणी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. त्यादृष्टीने पाऊल टाकत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पाहणी करून आठ टेकडय़ा निश्चितही केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी व अन्य अशा आठ टेकडय़ांच्या परिसरात कास पठाराच्या धर्तीवर पुष्पांचे बीजारोपण करण्यात येणार आहे. पश्चिम घाट परिसर असलेल्या सातारा जिल्ह्य़ातील तापमान, भौगोलिक हवामान व त्याच अंगाने औरंगाबाद जिल्ह्य़ाचाही विचार करून स्थानिक पातळीवरील, सांगली, सातारा, बुलडाणा, नाशिक आदी परिसरात उगवणाऱ्या ७० प्रकारचे पुष्पबीज संकलित केलेले आहे. जिल्ह्य़ात राबवण्यात येणारा एक नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून झकास पठाराच्या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रयोगासाठी दोन्ही जिल्ह्य़ांचे हवामान, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन व प्रत्येक जिल्ह्य़ात असणारे विशिष्ट प्राणी, वनस्पती आदींचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून त्यानुसार झकास पठार आकारास आणण्यासाठी काम सुरू असल्याचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सरदार यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्य़ाला ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेल्या आहे. जिल्ह्य़ाची ओळख पर्यटननगरी म्हणून आहे. पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील स्थळे पाहण्यासाठी अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असताना आणि येथील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्य़ातील कास पठाराच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. बीजबँक तयार विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदानी, गुलाब बाभुल, केरल, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काले तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णु क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलांची बीजबँक तयार केलेली आहे. कासच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्याच्या प्रकल्पासाठी स्थायी समितीच्या सभेत ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव पारित करण्यात आला. या प्रकल्पासाठी तलाठी, केंद्रप्रमुख, पर्यावरण, वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, कृषी विभागाचे अधिकारी, आदींची एक कार्यशाळा घेण्यात आली आहे. सारोळा, भेंडाळा व अजिंठा व्ह्य़ू या तीन ठिकाणी येत्या पावसाळ्यात संकलित केलेल्या २ क्विंटल ३७ किलोंच्या पुष्पबीजांचे रोपण करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या मदतीने पठारप्रदेशावर नांगरणी, सिंचन केले जाईल. - सुनील भोकरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग.