सलग तीन वर्षांपासूनची नापिकी, अजूनही पेरणीची न झालेली जुळवाजुळव, पुनर्गठनासह नव्या पीककर्जाबाबत अजूनही संदिग्धता अशी सगळी संकटे असतानाही या वर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या खरीप मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. सद्यस्थितीत कापसापासून शेतकऱ्यांनी परावृत्त व्हावे, असे सगळेच सांगत असताना या मेळाव्यात सर्वाधिक कापूस बियाणे विक्रेत्यांनीच स्टॉल लावले होते! यंदाही बियाण्यांच्या विक्रीवरून शेतकरी कापसाच्याच दुष्टचक्रात अडकतो की काय, असेच एकूण चित्र कापूस बियाण्यांच्या स्टॉलवर दिसून येत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळावा घेतला जातो. यंदाच्या मेळाव्यासही मराठवाडय़ाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. शेतकरी मेळाव्यानिमित्त कृषी विद्यापीठ परिसरात सर्वत्र कपाशीच्या बियाणे उत्पादक कंपन्यांनी जोरदार जाहिरातबाजी केली होती. विद्यापीठाच्या संरक्षक िभतीसह झाडांच्या बुंध्यावरही बियाणे कंपन्यांनी फलक लावले होते. संपूर्ण विद्यापीठ परिसरात बियाणे उत्पादक कंपन्यांची फलकबाजी उठून दिसत होती. मेळाव्याच्या प्रवेशद्वारालगतच बियाणे कंपन्यांचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात होते. कृषी विद्यापीठाला यंदा बियाणे विक्रीत मागे यावे लागले. अवर्षणाचा फटका विद्यापीठ प्रक्षेत्रावरील हंगामालाही बसल्याने केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले. यंदा कृषी विद्यापीठाचे बियाणे फारसे विक्रीस नव्हते. पण बीटी कपाशीचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी मात्र संपूर्ण खरीप मेळावाच ‘हायजॅक’ केल्याचे चित्र दिसून आले. यंदा खरीप मेळाव्यात हनुमान, डायमंड, रोबो, कावेरी जादू, रासी ६५९, ७७९, जोश, के.एस.एल.१०३१, अनमोल, क्रांती, आविश, सुपरडुपर, कावेरी एटीएम, युवा, सुपर्ब अशी असंख्य नावे धारण केलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे कपाशीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होते. गेल्या तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी आíथक अडचणीत सापडत असल्याने कापसाला पर्याय म्हणून अन्य पिकांकडे त्यांनी वळावे, या साठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचार सुरू आहे. मात्र, या खरीप मेळाव्यात कापूस उत्पादक कंपन्यांनी केलेली जोरदार प्रचार मोहीम आणि किमान ५० ते ६० स्टॉलच्या माध्यमातून झालेली ‘बीटी’ बियाण्यांची विक्री पाहू जाता शेतकरी पुन्हा कापसाच्याच नादी लागल्याचे चित्र दिसून आले. मेळाव्यात कपाशी बियाण्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. नांदेडच्या सीमेवर असलेल्या तेलंगणा भागातील शेतकरीही या वेळी काही प्रमाणात दिसून आले. तेथील सरकार शेतकऱ्यांना कापसापासून परावृत्त करीत आहे. त्यामुळे बीटी कपाशीचे बियाणेही तिकडे मिळत नाही. त्यामुळे येथून बियाणे खरेदी करीत आहोत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.