राज्यात वर्तवण्यात आलेल्या पावसाचे अंदाज कधी नव्हे ते खरे ठरू लागले आहेत. पावसाच्या अंदाजानुसार मंगळवारी व बुधवारी मराठवाडय़ातील काही भागात हलका, मध्यम व जोरदार बेमोसमी पाऊस झाला असून त्यामुळे शेतीतील काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, मका आदी पिकांसह मोसंबी, संत्रा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद शहरात बुधवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह औरंगाबाद शहरासह परिसरातील चितेगाव, आडगाव, पिंपरी, गोलवाडी, गोलटगाव, पैठण, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, वैजापूर, बिडकीन, गंगापूर आदी तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. वादळ-वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे काही तास औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील वीजही गूल झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेले आणि सध्या सोंगणी सुरू असलेले गव्हाचे पीक मात्र अक्षरश: आडवे झाले. ज्वारीही काढून ठेवण्यात आली असून ती यंत्रातून काढण्याची तयारी शेतकरी करीत असतानाच पावसाने झोडपले. काही ठिकाणी मकाही काढायचे काम सुरू होते. मात्र पावसाने तेही काम अर्धवट राहिले असून आता भिजलेल्या मक्यातून हाती काय येणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. गोलेगाव येथील संतोष जिते म्हणाले, गावात गव्हाची सोंगणी सुरू असतानाच मंगळवारी पाऊस सुरू झाला. मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने एवढे नुकसान झाले नव्हते. मात्र कालच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सध्या मोसंबीचा अंबेबहार सुरू आहे. नेमका याच काळात मंगळवारी व बुधवारी आडगाव, चितेगाव आदी परिसरात वादळ-वाऱ्यासह पाऊस झाला. मोसंबीचा अंबेबहार पूर्ण झडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोसंबीसह संत्रा उत्पादक, गहू, ज्वारी, मका शेतीचेही अतोनात नुकसान झाले, असे आडगाव येथील अशोक लोखंडे यांनी सांगितले.