औरंगाबादमधील नारेगाव परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुमताज तामशिकर (४०) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर मोहन तामशिकर असे पतीचे नाव आहे. मोहनने स्वयंपाक घरातील मुसळ डोक्यात घालून पत्नीचा खून केला आहे.

मोहन हा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नी मुमताज हिला मारहाण करायचा. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे तो रविवारी रात्री दारू पिऊन घरी आला. त्यामुळे वादाला तोंड फुटलं. शब्दाने शब्द वाढला आणि वाद विकोपाला गेला. यावेळी दारुच्या नशेतअसणाऱ्या मोहनने मुमताजच्या डोक्यात स्वयंपाक घरातील मुसळ घातले आणि पसार झाला. मुमताजच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुमताज यांना आवाज दिला. मात्र, घरातून कोणाचाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे या तरुणाने घरात डोकावून बघितले. त्यावेळी मुमताज रक्तभंबाळ अवस्थेत असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर या तरुणाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मोहन उर्फ बिच्चू हा सराईत गुन्हेगार आहे. २०१३ मध्ये एका वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी त्याला दोन वर्षाची शिक्षा झाली होती. याशिवाय मोहनवर अनेक गुन्हे दाखल असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. मुमताजला २ मुली आणि १ मुलगा आहे. मोहनवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुमताजच्या नातेवाईकांनी केली आहे.