अपुऱ्या पावसामुळे उसाचे अपुरे उत्पादन, त्यामुळे कमी क्षमतेने होणारा साखर कारखान्याचा गळीत हंगाम लक्षात घेऊन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात तेलबियांवर व डाळवर्गीय पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून शेतकऱ्याला अधिक पसे देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार दिलीपराव देशमुख यांनी ३२व्या वार्षकि सर्वसाधारण सभेत सांगितले अन् शेतकऱ्यांनी टाळय़ांच्या कडकडाटात या नव्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. ३२ वषार्ंपूर्वी ज्या माळरानावर कुसळही उगवत नव्हते तेथे साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली व साखर कारखानदारी क्षेत्रातील देशातील सर्व विक्रम मांजरा साखर कारखान्याने मोडीत काढले. गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणामुळे ऊस उत्पादन घटले. यावर्षी ८० टक्के ऊस लावणीत घट झाली. या स्थितीत कारखाने चालवणे व शेतकऱ्यांना अधिक भाव देणे हे कारखान्यासाठी अतिशय अडचणीचे आहे. साखरेशिवाय उपपदार्थाची निर्मिती करत उसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न झाला. आता उसाचेच उत्पादन कमी होत असल्यामुळे साखर कारखानेच भंगारात काढण्याची वेळ आली. या स्थितीत डगमगून न जाता परिस्थितीवर मात करण्यासाठी साखर कारखाना बारा महिने सुरू असला पाहिजे. उसाचे गाळप झाल्यानंतर या परिसरात सोयाबीनचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. सोयाबीनचे तेल काढण्यापासून अनेक प्रक्रिया उद्योग कारखान्यात सुरू करता येतील का? शिवाय रब्बी हंगामाच्या कालावधीत तुरीचे व हरभऱ्याचे मोठे उत्पादन होते. मूग, उडदाचे उत्पादनही वाढू लागले आहे. कारखान्याच्या परिसरात डाळवर्गीय पिकांवर प्रक्रिया करता येईल का, असाही विचार सुरू केला आहे, असे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मराठवाडय़ातील साखर कारखान्यांनी यापुढे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत, असा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मराठवाडय़ात तब्बल ४३ साखर कारखाने आहेत. मांजरा साखर कारखाना हा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणारा एकमेव कारखाना आहे. भविष्यात या कारखान्यात हे उद्योग सुरू झाले तर कारखाने हे शेतकऱ्यांसाठी मंदिर आहे याची जाणीव नव्याने शेतकऱ्यांना होईल.