औरंगाबादमधील गंगापूरमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरु असलेल्या 'जलसमाधी' आंदोलनात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हिंगोली - कळमनूरी महामार्गावर तीन जणांनी एसटी बसची तोडफोड केली. गंगापूर तहसील कार्यालयासमोर शेकडो तरुणांचे ठिय्या व उपोषण आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी दुपारी मराठी समाजाच्या वतीने 'जलसमाधी' आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान एकाचा मृत्यू झाला. गंगापूरमधील घटनेचे पडसाद औरंगाबादमध्येही उमटू लागले आहेत. हिंगोली- कळमनूर महामार्गावर लासिना पाटीजवळ संध्याकाळी साडे चार वाजता तीन जणांनी एसटी बसवर दगडफेक केली. हैदराबाद - अकोला बसची काच या तिघांनी फोडली असून यात बसचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. परभणीमध्येही तीन ते चार ठिकाणी बसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, जालन्यात मंगळवारपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ५८ आंदोलनानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. सोमवारी जालन्यात मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मंगळवारपासून ठोक मोर्चाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात समाजातील ११ आमदार व खासदारांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.