नांदेडपाठोपाठ औरंगाबादने एमआयएमला साथ दिली. नांदेडमध्ये पक्षाचा पार सफाया झाला. त्यातून औरंगाबादमधील नेतेमंडळी धास्तावले असतानाच पक्षात नवीनच चलबिचल सुरू झाली आहे. पक्षाचे शहरातील आमदार इम्तियाज जलील यांना शेजारच्या सुरक्षित मतदारसंघाचे वेध लागल्याने त्या मतदारसंघातील इच्छुकांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमचे जलील विजयी झाले. त्यापाठोपाठ औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. विरोधी पक्षाची भूमिका सध्या एमआयएम भूषवीत आहे. प्रसार माध्यमाची पाश्र्वभूमी असल्याने आमदार इम्तियाज जलील हा राज्यातील एमआयएमचा चेहरा झाला. विविध समारंभ तसेच वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका ते मांडतात. पक्षाचे नेते खासदार असाउद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरउद्दीन ओवेसी यांचे जलील ते निकटवर्तीय मानले जातात.  पण जलील यांच्या भूमिकेमुळे सध्या पक्षात पेच निर्माण झाला आहे.

इम्तियाज जलील यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक अधिक अवघड जाईल, असे मानले जाते. त्यामुळेच त्यांचे लक्ष शेजारील मुस्लीमबहुल औरंगाबाद पूर्व मतदारसंघावर केंद्रित झाले आहे. गेल्या वेळी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांनी  ६०,२६८ दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांनी पुन्हा या मतदारसंघातून लढण्याची तयारीही सुरू केली आहे. डॉ. गफ्फार कादरी मात्र दररोज एका भागात आवर्जून भेट देत आहेत.

ते कोणत्या भागात कधी जाणार याचे वेळापत्रक उर्दू दैनिकांमध्ये प्रसिद्ध होत असते. हा मतदारसंघ एमआयएमसाठी अधिक सुरक्षित असल्याचे आता मानले जाते. यामुळेच आमदार जलील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या नव्या गणितामुळे आमदार इम्तियाज जलील व गफ्फार कादरी यांच्यामध्येही एक शीतयुद्ध सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

उमेदवारी ठरण्यासाठी अद्याप बराच अवधी आहे. पण हे खरे आहे की औरंगाबाद मध्य ऐवजी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, हा सर्व निर्णय पक्षप्रमुख घेतील. त्या विषयी आता बोलणे योग्य होणार नाही.

इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम