आ. चव्हाणांचे आ. बंब यांना उत्तर

शरद पवार यांच्याविषयी बोलले की प्रसिद्धी मिळते. स्वपक्षात किंमत वाढते आणि किंमत वाढली की मोठय़ा पदांची स्वप्ने पडू लागतात. मात्र, ज्यांना राजकारणाची बाराखडी आता उमगली, त्यांनी पवारांविषयी बोलू नये, अशी खरमरीत टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली.

आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच पवार यांच्यावर टीका करताना ‘पवारांच्या विधानांचा परिणाम नाही, फक्त चर्चा होते’ असे विधान केले होते. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना आमदार चव्हाण म्हणाले की, राज्यात आघाडी सरकार असताना बंब यांनी आपल्या हातावर ‘घडय़ाळ’ बांधून घेतले होते. त्यामुळे पवारांचे कार्य त्यांनी जवळून पाहिले आहे. पवारांचे कार्य-कर्तृत्व महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश जाणतोच. पवार यांनी नेहमीच विरोधकांवरही अभ्यासपूर्ण टीका केली. राज्य दुष्काळात होरपळत असताना पंतप्रधान मोदी परदेश दौरे करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे या वेदनेतून त्यांनी ही टीका केली होती. पवार यांच्यासारख्या सहृदयी नेत्याने खंत व्यक्त करणे साहजिक होते. मात्र, आमदार बंब यांनी पवारांविषयी बोलून आपल्या प्रसिद्धिलोलूप वृत्तीचे दर्शन घडवले. त्यांनी आपली राजकीय ‘उंची’ पाहून या पुढे विधाने करावीत, असा खोचक सल्ला आमदार चव्हाण यांनी दिला. आमदार बंब यांनी पवारांवर टीका करण्यापेक्षा मराठवाडय़ासाठी मंजूर झालेले व विदर्भाकडे वळवण्यात आलेले आयआयएम, आयसीसी, लॉ स्कूल, साईचे विभागीय केंद्र आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी सरकारदरबारी भांडले असते, तर मराठवाडय़ाच्या हिताचेच ठरले असते. आपल्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात सामान्य जनतेचे प्रश्न, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विकासप्रश्न गंभीर आहेत. सत्ताधारी भाजपच्या बाजूला गेलात, तर त्या सत्तेचा मतदारसंघाच्या विकासासाठी फायदा करून घ्या, अशी सूचनाही चव्हाण यांनी