औरंगाबाद, पुणे केंद्रावर सर्वाधिक विद्यार्थी

औरंगाबाद : करोना संसर्ग वाढत असल्याने शनिवार आणि रविवार पूर्णत: टाळेबंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देण्यासाठी शहरात येणाऱ्या हजारो परीक्षार्थीच्या अडचणीत भर पडणार आहे. रविवारी १४ मार्च रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षा होणार आहे.

गेली अनेक वष्रे ही परीक्षा झालेली नाही. औरंगाबाद आणि पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र खोली करून अभ्यास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग, भोजनालये याची एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण व्हावी अशी स्थिती करोनापूर्व स्थितीमध्ये होती.

करोनाकाळात अनेक जण गावी परतले. ते पुन्हा शहरात येण्याचा वेग तुलनेने कमी होता. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी औरंगाबाद आणि पुणे येथे येणार आहेत.

औरंगाबादसह काही शहरांमध्ये जनता संचारबंदी लावण्यात आली असून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी आणि परीक्षा दिल्यानंतर जेवणासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

होणार काय?  शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदी लागू केली असल्याने बाहेरगावाहून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल आणि भोजनालये उघडी असणार नाहीत. त्यामुळे घरून शिदोरी बांधून परीक्षेसाठी यावे लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ५९ केंद्रांवर १९ हजार ६५६ परीक्षार्थीचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ औरंगाबादच नव्हे तर विदर्भात आणि पुणे येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संसर्गाच्या वाढत्या भीतीमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे.

’ राज्यात दोन लाख ६३ हजार २५६ परीक्षार्थी ७६१ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

’ वर्धा, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांची संख्या कमी आहे.

’ पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सातारा, ठाणे या जिल्ह्य़ांमध्ये परीक्षार्थीची संख्या दहा हजारांहून अधिक आहे.

’ राज्यात पुणे आणि औरंगाबाद या दोन केंद्रावर सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ३१ हजार १२८ व १९ हजार ६५६ परीक्षार्थी महराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत.