देवत्व देऊ नका आम्हा, सर्वसामान्यच ठेवा. सर्वांचेच पाय मातीचे असतात, असे उद्गार अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात काढले. नाना आणि मकरंद यांनी शेतकऱयांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘नाम’ या संस्थेच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाना, मकरंद यांनी शेतकऱयांना सढळ हस्ते मदत देऊ केली. औरंगाबाद जिल्ह्यातील धुंदल आणि वर्ध्यातील आमला ही गावे ‘नाम’ या संस्थेकडून ग्रामविकासासाठी दत्तक घेत असल्याचे नाना आणि मकरंद यांनी जाहीर केले. तसेच आगामी काळात दुष्काळ निर्मुलन, ग्रामीण विकासासोबतच गाव आणि शहरांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचे उद्दीष्टही त्यांनी स्पष्ट केले. नाम या संस्थेने १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केल्याचेही अनासपुरे यांनी यावेळी सांगितले.