चौदाव्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचं गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत आता १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार आहे. या दृष्टीने ग्रामपातळीवर पाच वर्षीय विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. सरकारने ४ नोव्हेंबरला घेतलेल्या निर्णयानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास आराखडय़ात खर्चाचे नियोजन करताना मानव विकास निर्देशांक विकसित करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्यक्रम ठरवण्याचे कौशल्य विकसित करणे, केंद्र-राज्य सरकारांच्या योजनांची ग्रामपंचायत स्तरावर सांगड घालणे आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती गण, तालुका-जिल्हा स्तरावर कोणी काय करावे याच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.